31.1.07

मन असे तसे

मनाची ओळख
अंधार काळोख
फांदीवर पक्षी
धडधड वक्षी
खळाळते पाणी
कडू गोड गाणी
संध्याकाळ सुस्त
खारुताई मस्त
कधी नवसाचे
कधी पावसाचे

वेडे वेडे मन
ढगातले ऊन
माणसांची वस्ती
भुतावळ नुस्ती
वाऱ्याचा सोसाटा
गावात बोभाटा
आपलेसे सख्खे
नवखेच अख्खे
कधी मागणारे

कधी त्यागणारे

शब्दार्थ

अर्थाचा सागर
शब्दांची घागर
कसा घालू मेळ?
अक्षरांचा खेळ
शब्द एक व्यर्थ
किती तरी अर्थ
असे कसे शब्द
जिण्याचे प्रारब्ध
शब्दांची ही फेरी
भलती लहरी

भूल

लाटांचा खळखळाट
जलगंभिर वेणुनाद
सळसळत्या झावळ्यांस
घालितसे चंद्र साद
भीषण गर्जुन रडे
अंधारा पाडि तडे
खोल तरी अंतरात
सागरास भूल पडे

ध्येय

नवीन वाट शोधुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे

मधेच सागरात शीड फाटले जरी
खुळे प्रयास वादळात आटले जरी
नवीन श्वास घेउनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे

प्रलोभनात पाडतील ही सुखे जरी
सदैव हात जोडतील ऐहिके तरी
क्षणैक मोह टाळुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे

रणात श्वास थांबलेच आजला जरी
तुला न ध्येय साधलेच आजला तरी
नवा विचार ठेवुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे

कवी

धरलंच जर मी मौन
तर घेतात सगळे डाऊट
म्हणतात नक्कीच साला,
पिऊन झाला असेल आऊट!

जर मी केली बडबड
म्हणतात चढली याला
झेपत नव्हती तरी कशाला
मारून मुटकून प्याला?

विषण्णतेला असे रेखतो
कविता करून घेतो
दाद द्यायला हसती ते;
मी टाळी समजून घेतो

टोचून टोचुन मारायाची
सवयच त्यांना जडलेली
तरीही त्यांना हसवायाची
सजा कवीला घडलेली!

व्यथा

सगळ्याच व्यथांना
औषध नसते
कळेल का तुजला?!
उगाच बांधू
नये धुळींचा
मजल्यावर मजला!

30.1.07

वेडा

कुणी म्हणाले मुर्ख असावा
कुणी म्हणाले प्याला
कोण बोलले काय, कशाचे
भानच नव्हते त्याला

साधा भोळा माणूस अगदी
स्वभाव सुद्धा साधा
काय जाहले कुणा ना कळे
झाली कसली बाधा?

रोज भेटतो असा झाडतो
भर रस्त्यावर पाय
अशा माणसासोबत आपण
बोलावे तरी काय?

कशी लागली आग आतुनी?
काय असावे झाले?
घशास नुसती कोरड कोरड
आणिक डोळे ओले

गल्लोगल्ली फिरतो आता
मधेच खो खो हसतो
मधेच इतका शांत राहतो
कुणामध्येही नसतो

मुले मारती दगडे अन
हा कपडे टाकुन पळतो
लाख माणसे हसती अन
हा आतून तिळतिळ जळतो

कधी एकटा शांत बसून हा
केस खाजवीत हसतो
काळ्या कळकट त्वचेस आणि
हळूच सोलत बसतो

या सगळ्यातून भर माध्यान्ही
त्यास लागता डोळा
खोल आतुनी वठलेला तो
दिसतो चोळामोळा

अन रात्रीचा कर्णबधीरशा
मारत बसतो बोंबा
जणू देवाला विचारतो हा
“सांग कुठे रे थांबा”

24.1.07

मुरणी

एवढी सुंदर मुलगी, मला कशी ओळखेल?
छट! ती तर मला भलताच समजली असेल…
नाही, नाही नक्कीच हिला पाहिलं आहे कु्ठेतरी
नजर मात्र तिच्या मुरणीवर थांबलीय खरी!
ओळख पटली नाही; पण ती हसली नक्की
आपण तिला ओळखतो- खात्री झाली पक्की
कोण? कुठली? ओळख काय? विचारांच थैमान
तिच्या रुपात न्हाऊन न्हाऊन मन सुद्धा बेभान
पण सालं मुरणीच माझा एवढा जीव का घेतेय?!
आयला! ती पण हसत हसत इकडेच चालत येतेय!!
गोड गुलाबी, सोनपरी ती उंचीपुरी चिकार!
तिच्यापुढे तर साक्षात सगळ्या अप्सरा पण भिकार!!
केवढी सुंदर, केवढी छान, बोलण्यातही हुशार!
तिचा शब्द म्हणजे सगळ्या अंगावरती तुषार!
लाडेलाडे धावू लागली शब्दांमधून हरणी
चांदीत हिरवा खडा घालून नाकात होती मुरणी!
सालं आत्ता आठवलं मी हिला कुठे पाहिलं
तिचा विचार घेऊन मन भुतकाळातच राहिलं
दोन वेण्या, तेलकट चेहरा, नाकालाही धार
मुरडण्याची हौस तिला; मुरणीवर प्रेम अपार!
परिस्थिती गरीब घरची! घरात साधी गिरणी
काँग्रेसच्या मग गवताची ती नाकात घाली मुरणी!
खुदकन हसली ती अन तंद्रीमधून बाहेर पडलो
ओळखलस का मला? म्हणताच मीही पुरता गडबडलो
आता म्हणशील बावळट? बोलता बोलता खेटली
तिला अपेक्षित सगळी उत्तरे डोळ्यांमधून भेटली
पण तू मात्र साऱ्या, भलताच बदलला आहेस
विशीत असून सुद्धा साठीत कलला आहेस!
बोलणं माझं ऐकुन मित्रा तुला नक्कीच बसेल धक्का
पुर्वीच होतास छान आता माकड झालायस पक्का
अळवासारखा चेहरा झाला क्षणात खाल्ली हाय!
बोलण्याआधीच बोलणं संपलं आता पुढं काय?
देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी
आयुष्यभर लक्षात राहील आता फक्त मुरणी!
अरे वेड्या लगेच एवढा होवू नको उदास
खरं सांगू? मी तुला केंव्हाचच केलय पास!
आयुष्यभर मला बावळट म्हणत राहाशील का?
बोलताना फक्त असंच डोळे भरून पाहाशील का?
काहीच न कळून मी तिला बसलो पाहात
माझ्या नकळत तिने घेतला हातात माझा हात!
देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी
गाढवावरही कधी कधी भाळून जाते हरणी!!
आयुष्यभर समोर राहील आता फक्त मुरणी!!!

झगडा

भस्म लावले अंगाला
अन फिरू लागलो उघडा
रोज पु्जिले जे देवाला

त्यास म्हणालो झगडा!

गोटा

देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू
रोज रोज हे नवीन अपघात कसे साहू?

सगळ्याच आठवणी आता झाल्यात ओझे
हरेक क्षण फितूर, दुष्मन बनलेत माझे
चुकार, भिकार, टुकार, होकार, नकार
सगळेच विकार मुरलेत खोल आत आता
सांग ना मी एकटा कुणाकुणाला वाहू?
देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू

मी घाबरतो आता माझ्याचसमोर यायला
आरसाही उठतो खायला, त्रास द्यायला
अहम, त्रास, मनस्ताप, विरह, एकटेपणा,
सगळेच ऐकवतात आपआपलेच रडगाणे
या सगळ्यांमध्ये “मी” कोरडा कसा राहू?
देवा मला खरंच नर्मदेचा गोटाच कर पाहू

संजीवन

अधरावर थरथरत्या
प्रितीची चाहुल ये
गालांवर रक्तिमशा
लज्जेचे पाउल ये
थरथरत्या हातांनी
बावरल्या श्वासांनी
विरघळ ये मन्मिठीत
संजीवन दोघांना!

नीज

दाही दिशा झाल्या
अंधाराने ओल्या
डोळ्यांत रंगले
स्वप्नांचे बंगले
अंगणात आले
चांदण्यांचे झुले
अंगभर धूर
मनात काहूर
पापण्यांचे गूज
डोळ्यांवर नीज

सर्दी

एकदाच तुझी पावसावरची कविता वाचली
महिना झाला तरी सर्दी हटत नाहीये
कुणी
दिला
तुला
इतकं
भिजवायचा
अधिकार???

“सांभाळ स्वत:ला”

“सांभाळ स्वत:ला” अजुनी सांगत असते!
शपथाही भलत्या सलत्या घालत बसते!
प्रत्येक कळीचे निर्माल्य व्हायचे येथे…
निर्माल्य कधी ना फुलते तिजला ठाऊक नसते!!!

नाणी

आले ऊन
गेले ऊन

बगळ्यांची गाणी!

निळेशार
गार गार
पावसाचे पाणी!

धरेवर
सर्व दूर
सौंदर्याच्या खाणी!

अंगणात
पारिजात
त्याला आली नाणी!!!

जाण

जो जाणेना अन जाणेना, की जाणेना काही
तो मुर्ख तयाला जाण कशाची कधीच आली नाही!

जो जाणे पण ना जाणे की तो जाणे काही;
जागवा तयाला जाण करून द्या पकडून दोन्ही बाही!

जो जाणेना पण हे जाणे की तो जाणेना काही
तो मनुष्य आहे शुद्ध त्यामध्ये सखा जवळचा पाही!

जो जाणे अन हे जाणे की तो जाणे सगळे काही;
मानले गुरु मी त्याला माझा देव त्यामध्ये राही!

गज़ल

हाथ मे फिर से आज जाम आया
गमे मैफ़िल मे तेरा नाम आया

दो कदम ही तो और चलना था
बस तेरा ख़्वाब था जो काम आया

मुझको इस तर्हा उसने कत्ल किया
मेरे ही सर मेरा इल्जाम आया

आँस थी टुँटी तेरी गलियोकी
आँखरी वक्त क्युँ पयाम आया?

बडी मुश्कील से आँसु रोंके थे
और वो दर पे तिश्‍नाकाम आया

जब लगा साथ चल सकेंगे हम
अगले पल आखरी मुकाम आया

ऐसा अंजामे-वफा मुझको मिला
वो मुझे बेचने बज़ार सरे-आम आया

23.1.07

याद

आप ही याद आते रहे रात दिन
बारहा यूँ सताते रहे रात दिन
अपनी बातोंमे ये क्या मिलाते गये?
हँसते हँसते रुलाते रहे रात दिन

Life

Life is a Gazal! To enjoy it, you must first know its grammer!!

22.1.07

पतंग

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे निखील लक्ष्मी रोड आणि जंगली महाराज रोड यांना सांधणाऱ्या “प्रेमी-युगूल” ब्रिजवर गाडी निमूटपणे पार्क करत होता. अगदी पतंग हॉटेलसमोरच! “प्रेमी-युगूल” हे निखीलनेच त्या ब्रिजला दिलेले नाव! इथेच एकेकाळी तो आणि ती भेटायचे.
तसा तो रोजच इथे येतो, पण एकटाच. समोरचा रंग उडालेला पतंग पाहून हसतो. आणि एक सिगरेट घेऊन पाच मिनीटांमध्ये निघूनही जातो. खिशातून सिगरेट काढायची आणि कर्तव्य म्हणून धूर आत बाहेर करायचा की झालं. मग मात्र सरळ घरचा रस्ता. वाढत्या वयाबरोबर कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यावा हे त्याला अचूक कळू लागलय! पण आज का कोणास ठाऊक त्याला उगाच तिथे थांबावसं वाटत होतं. आज जवळ जवळ पंधरा दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला होता त्याला.

“पंधरा दिवस… काय केलं होतं बरं मी या पंधरा दिवसात?”
निखील स्वतःच्याच तंद्रीत हरवला.

“कितीतरी प्रॉमिसेस सरळ सरळ तोडले होते. बाकी कोणाचं काही नाही पण माझ्या लाडक्याला पतंग आणि मांजा आणून द्यायचा होता...”
रिकाम्या वेळी आयुष्यातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीची आठवण न होणे जरा कठीणच! आणि त्यामुळेच याक्षणी निखीलला सगळ्यात जास्त हळहळ मुलाला दिलेला शब्द न पाळल्याची वाटत होती.

“त्याला पतंग उडवायची भारी हौस! अगदी बापावर गेला आहे तो त्या बाबतीत!!”
स्वतःशीच पुटपुटत निखीलने सिगरेट पेटवली आणि धुराबरोबरच त्याचं मन पतंगासारखं उंच उंच उडत गेलं.
हवेत स्वैर उडणाऱ्या पतंगाला सावरायला बऱ्याचवेळा किमान मांजा तरी असतो!!

“एकेकाळी काय पतंग उडवायचो आपण. अगदी वेड लागायचं पतंगांच्या दिवसांमध्ये…”
तसा निखील मुळचा एकही कान्हा मात्रा वेलांटी नसलेल्या, आतून बाहेरून सरळ अशा अहमदनगरचा!
नौकरीनिमित्ताने नगर जे सुटलं ते कायमचच. आता फक्त दिवाळी ते दिवाळी…!

“…दिवाळी संपल्यापासून पतंग उडवायला जी सुरुवात होई, ती तशीच व्यसनाप्रमाणे कलेकलेने वाढत संक्रांतीपर्यंत चाले.”
आठवणी उजळत होत्या आणि खोल पाण्यातला बुडबुडा पृष्ठभागावर येऊन फुटावा त्याप्रमाणे फुटत होत्या.

“अरे काचेचं काय करायचय?” कोणीतरी म्हणायचं.
“करायचय काय, घरात गेलेले बल्ब असतील ते गोळा करू आणि पोत्यात घालून कुटू. आहे काय त्यात?”
ही स्वस्तात काचेची पुड मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत होती.

“चला टायर मिळालं मला, इथेच होतं कचराकुंडीत पडलेलं.”
आणखी एक दोन मित्र मग त्या उत्साहात भर घालित असत. त्या टायरवर शिरस उकळवणे होऊन जाई. टायर विझवणे हा देखील एक खेळ होऊ शकतो हे त्यावेळी त्यांना कळालं होतं! शेवटी कोणीतरी घरून पाणी आणून आग विझवत असे. आणि तेही करायचे नसेल तर सार्वजनिक हपसा नाहीतर उघडी गटारे!

“फाटके कपडे तरी आणा रे तुम्ही.”
सगळ्यात मागे मागे राहणाऱ्या एक दोघांच्या अंगावर ही जोखीम येऊन पडत असे. हे कपडे गोळा करणे म्हणजे एक मजेशीर काम असे. ज्याकुणावर ही पाळी येई त्याला कुठून तरी असे फाटके कपडे चोरून आणावे लागत.

“अरे रंगाचं काय?”
रंग कुठला आणायचा यावरून वादविवाद स्पर्धा चालत आणि त्यात हमखास जिंकणारे रंग असत लाल, केशरी किंवा पिवळा!
या मित्रमंडळींपैकी जो स्वभावाने (आणि शरीरानेही!) सगळ्यात गरीब त्याला गरम गरम शिरस पकडावी लागे! एक जण काच पकडायला, एक धाग्याचा रीळ पकडायला, आणि आणखी एक मांजा चकरीवर गुंडाळायला. कित्येकवेळा दोऱ्याचा रीळ मित्रांअभावी तारेत अडकवून ठेवावा लागे. अशा साग्रसंगीत पद्धतीने त्यांचा मांजा सुतवून होत असे. मग एकमेकांत चूरस, कोणाचा पतंग जास्त वेळ आकाशात टिकतो ते. एक ना अनेक युक्त्या दुसऱ्याला गौण दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या. या सगळ्या अहमहमिकेसाठी अर्ध्यातून पोटदुखीच्या नावाखाली शाळा बुडवणे; कुठलेतरी सर किंवा बाई त्यांचे आजी किंवा आजोबा वारल्यामुळे घरी गेले आहेत म्हणून सुट्टी आहे अशी घरच्यांना; आणि आपला काका किंवा मामा आजारी आहे अशी शाळेत थाप मारणे अशा अनेक करामती निखीलला आठवू लागल्या.

“आपली सगळी बोटे या थंडीच्या दिवसांमध्ये कशी पायाच्या भेगांसारखी कायम कापलेली असत.
मग पातळ भाज्या जेवणात वर्ज. आणि तसेही जेवणात लक्ष लागत नसेच. सगळे लक्ष गच्चीतल्या गोंगाटाकडे. पण तरीही आईने भात केलाय की नाही याकडे विशेष लक्ष. आणि जर भात केलाच नसेल तर मग गोन्नी! फाटलेला पतंग चिटकवण्यासाठी गोन्नीचे लालचुटूक फळ तोडताना नाही नाही ते धाडस करायचो आपण त्यावेळी. ते बोरासारखे बारीक चिकट गोड फळ खायचे आणि त्यानेच पतंग चिटकवायचे. आज त्या फळाविषयी चारचौघात बोलायला देखील लाज वाटते आणि एकेकाळी आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे फळ होते ते! नंतर कधी तसले झाडच पाहायला मिळाले नाही. काय मजा आहे, आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांची आपल्याला गरज असते पण ते व्यक्त करण्याची हिंमतच होत नाही. कारण तसं करण्याची एकतर लाज तरी वाटते किंवा त्यामुळे अहंकार तरी दुखावला जाणार असतो...”
हा विचार मनात येताच निखील उगाच मोठ्याने हः करून हसला. आणि परत धुराला सोबत घेऊन विचारांच्या गुहेत पुढे सरकला.

“…पण या सगळ्यापेक्षा खरी मजा येई ती म्हणजे आपल्याला आवडणारा पतंग पाहात राहाणे आणि तो कटला की सैरावैरा त्याच्यामागे धावत सुटणे. मग मारामाऱ्या; भांडणे; पतंग फाडणे; तो फाटलेला पतंग पाहून हळहळणे; रुसणे; हिरमुसणे; आणि कधी कधी रडणे.”
आकाशातल्या रंगीबेरंगी पतंगाच्या जाळ्यासारखेच विचारांचे रंगीबेरंगी जाळे निखीलच्या मन:पटलावर पडले होते. आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा नुकतीच वात पेटवलेल्या पिवळ्याधमक समईसारखा लख्ख उजळत होता.

“संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी अगदी लहान असताना घरून डबे घेऊनच निघायचो. कोणाचा डबा पहिले भरतो यासाठी आणखी एक शर्यत. मग हळूहळू डब्याची जागा प्लॅस्टीकच्या पिशवीने घेतली आणि नंतर तीही नाहीशी झाली. जसे जसे वय वाढत गेले तशी त्या गोष्टीचीही लाज वाटू लागली आपल्याला, आणि क्षणात अनेक आवडती, परिचीत माणसे अनोळखी वाटायला लागली. खूप दूर निघून गेली सरून गेलेल्या वयाबरोबरच! मग उरली फक्त काही खास मित्रमंडळी. ही सगळी मित्रमंडळी रेवड्यांची पाकिटे घेऊन एकमेकांच्या गळाभेटीसाठी हमखास गल्लीत जमायची. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत एकमेकांशी ‘पतंगयुद्ध’ करणारे आम्ही कसे एकमेकांविषयी कुठलाही किंतू न बाळगता निखळ बोलायचो. खरंच तेवढे एकच किती छान होते लहान असताना! पण हळूहळू पतंगाच्या धाग्याप्रमाणे मनावरही पिळ बसू लागले आणि मग काही धागे हा पेच सोडवताना कायमचे तुटले. इतके की पुन्हा गाठ मारून देखील एकत्र आणण्याची सोय राहिली नाही!
काळाच्या ओघात जबाबदाऱ्या वाढत गेल्या. ओढून घेतलेली लफडी त्रासदायक होत गेली. या सगळ्यामुळे स्वभाव बदलत गेला. माणसे बदलली. करीअरसाठी गाव सोडावे लागले. या सगळ्यात आपली संक्रांत कुठेतरी हरवूनच गेली. तसं आवर्जून संक्रांतीला जाणं होतंच. पण संक्रांतीला अगदी शास्त्रापुरताच पतंग हातात येतो हे ही जाणवतय आता.
अगदी संक्रांतीच्या आदल्या दिवशी पुण्यावरून निघायचंच संध्याकाळी उशीरा. नगरला घरी जाऊन झोपायचं. सकाळी उठताच पहिला विचार प्रश्नार्थक, “संध्याकाळी कधी निघायच?” आणि आजकाल वाराही थोडा मनाविरुद्ध वागतो; पुर्वीसारखा हवा तेंव्हा येतच नाही! या सगळ्या कल्लोळातून कसाबसा पतंग वर उडालाच तर अनेक पतंग श्वापदासारखी झडप घालतात. त्यात बिचारा आपला जुन्या विचारांचा पतंग कुठे टिकणार या नव्या लोकांपुढे? परत दुसरा पतंग लावायचा उत्साहच राहात नाही. हे सगळं करता करता संध्याकाळी परत निघण्याची वेळ येते. तिळगुळ घ्यायचा तर राहिलाच पण घरी येणा्ऱ्या छोट्यांना द्यायला देखील वेळ मिळत नाही.”
या सगळ्या विचारांच्या घोळक्याने निखीलचे मन पुन्हा काजळू लागले. आणखी काही चांगल्या आठवणी हाताशी येतायत का हे पाहाण्यासाठी त्याने पुन्हा गच्च डोळे मिटले. पोळ्यावर दगड मारताच जसे मधमाशांचे मोहोळ उठावे तसे पुन्हा एकदा विचारांचे मोहोळ निखीलच्या मनात उठत होते. आणि दिशाहीन भरकटत होते. कधी अंगणात; कधी अंगणातल्या झाडापाशी; कधी गच्चीवरल्या गवतावर; कधी त्या गवतावरच्या पांढऱ्या फुलांवर; कधी त्या फुलांवर बसलेल्या पोपटी, पिवळ्याधमक, हिरव्या, सप्तरंगी फुलपाखरांवर; तर कधी बाभळीच्या काट्यांत; कधी उंच उंच ऍन्टीनामध्ये; कधी इलेक्ट्रीकच्या तारांवर; कधी औदुंबराच्या झाडात; आणि कधी कधी परत निळ्या निळ्या आकाशात; रंगीबेरंगी पतंगांत!
पुन्हा एकदा त्या सुखद आठवणींमुळे निखील तरतरीत वाटू लागला.

“रस्त्यावर कित्येकदा पतंग पकडायच्या नादात जय्यत तयारीने निघायचो आणि कायम रहदारीला अडथळा करायचो. कित्येकदा अनेक मित्र या धांदलीत गाडीखाली सापडता सापडता वाचलेले... “
हे आठवताच निखीलच्या अंगावर सर्रकन काटा आला. पायाला बसलेल्या डांबराच्या चटक्याची आठवणही ताजी झाली.
“काय भयानक प्रसंग होता तो. पतंगाच्या मागे पळत पळत कुठे चाललोय याचे भानच राहिले नव्हते. आणि अचानक आपण किंचाळलो “आई ग!”
रस्ता दुरुस्ती चालू असताना आपण अनवाणी तिथे गेलो आणि काळाकुट्ट डांबराचा खडा पायात रुतला होता. नक्की वेदना कशामुळे होतायत हेच कळत नव्हतं. खडा पायात रुतला म्हणून की डांबर पोळले म्हणून!”

“आऽह!”
नकळत हलक्या आवाजात वेदना निखीलच्या ओठांवर आली. आठवणींतून भानावर येत निखीलने हात प्रतिक्षिप्तपणे झटकला. सिगरेट संपल्याने बोटापाशी जळणाऱ्या फिल्टरचा त्याला जोरदार चटका बसला. त्याने चटकन ते थोटूक खाली फेकले

…विषय असाच कुठून कुठे भरकटत गेला असता; जर निखीलला सिगरेटच्या थोटकाचा चटका बसला नसता.
तेवढ्या पाचच मिनिटांत निखीलच्या डोळ्यासमोरून अनेक संक्रांती निघून गेल्या होत्या. सगळ्या संक्रांती क्षणिकच का होईना पण वेगवेगळा आनंद देणाऱ्या, आज मात्र अगदी सगळ्या तशाच सरळसोट आणि आळणी वाटत होत्या. मागे राहात होती ती फक्त एक अनामीक हुरहुर…

“आज तसल्याही सुखाला आपण पारखे आहोत….”
हा विचार मनात येताच त्याला परत त्याच्या लाडक्याची आठवण झाली.

“आज छोकऱ्याला नक्कीच पतंग घेऊन जाऊ!”
किमान तेवढे तरी केलेच पाहिजे हा विचार निखीलच्या मनात आला.

गाडी काढण्यासाठी निखील वळला आणि क्षणभर सुन्न मनाने तिथेच थांबला. यापुर्वी कित्येक पतंग हातून फाटूनही, पावसाच्या हलक्या हलक्या सरींनी आकाशातच भिजूनही, भांडणात ते स्वतः फाडूनही त्याला जेवढे खिन्न वाटले नसेल तेवढे वाटू लागले. रोज तो त्या पतंग हॉटेलच्या रंग उडालेल्या पतंगाकडे पाहून हसायचा. आज त्याने स्वतः त्या पतंगात रंग भरले होते; पण डोळ्यातल्या पाण्यामुळे तेही धुसर झाले होते. त्याचे उजळलेले मन परत काजळू लागले.

त्याने फेकलेले जळके थोटूक नेमके एका फाटक्या पतंगावर जाऊन पडले होते; आणि तो पतंग रेषारेषांतून भुरुभुरु जळत होता. निखीलच्या आभाळात अनेक विनाधाघ्याचे अगतीक पतंग वाऱ्यावर फरपटत होते! फाटत होते!!

20.1.07

कळी!

निर्माल्याची व्यथा वेगळी होती
फुलावयाची हौस आंधळी होती
ना गजरा केला कोणी
ना अर्पियली देवाला
ना मुले वेचण्या आली
ना दिले कुणी प्रेताला
जगण्याचे मग कारण काय म्हणावे
या चिंतेने ती व्यापून सगळी होती
सुटले ना कोडे तिजला
सुकली ती विचार करुनी
मग वारा आला जेंव्हा
क्षणभरात गेली उडुनी
जगण्याला ना अर्थ लाभला साधा
प्रश्नांची ती एक साखळी होती

खोपा

हतबल मी हतबल तू
हतबल हे जग सारे
पंखांना फडफडत्या
सोडुन गेले वारे
मोडुनिया पडलेले
खोप्याचे रडवेले
भेसुरसे रडगाणे
उधळुन गेले तारे

सोबत आणि विरह

ती:
निशब्द प्रेम दोन्हीकडे सारखंच असतं
सोबत आणि विरहात एकसारखीच वळणं

तो:
दोन्हीत खूप खूप फरक असतो
सोबत चंदनी ओलावा, विरह अकारण जळणं

गुपीत

ही जी सगळी गुपीतं असतात ना
त्यांचही एक खास गुपीत असतं
दुसऱ्या कुण्णाला कळू द्यायचं नाही
म्हणताना सगळ्यांनाच सांगितलेलं असतं.

चंद्र

नारळीच्या जाळीतून
चंद्र किती नाजूक दिसतो!
पण तो दिसतो तसा नसतो
नेमक हेच समजायला मी फसतो!!

कविता

आज ठरवूनच निघालो
म्हटलं शोधूच आज तिला,
माझ्या लाडक्या कवितेला!
मग सगळ्या ठरलेल्या जागा,
सगळ्या संकेतस्थळांना
एक वळसा मारून वर्तुळाकार...
पुन्हा सुरुवात केली तिथेच येऊन थांबलो...
हताश, उदास, एकलकोंडा नेहमीप्रमाणे...

मला अजूनही कळालेलं नाहीये
की परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!

सांत्वन

येणारे तर येतच गेले
जाणारेही जातच गेले
ज्यांना उर्मी बोलायची
तेवढेच सांत्वन देत गेले
पण दूर एका झाडाखाली
कुणी ढाळली टिपे मुक्याने...

आवाजाने त्या रडण्याच्या
कानच बहिरे होत गेले!

०४/११/०६

आठवण

कुठे तरी हरवून गेल्या दिवसाची,
मला तशी आठवण मुक्या पावसाची!

रातराणी जिथे जिथे थांबवते मला;
तिथे येते आठवण सुक्या परसाची!

जिथे तिथे टेकवतो माथा तुझ्यासाठी!
मला कुठे आठवण केल्या नवसाची?

19.1.07

आयुष्य

दोन अधीक दोन उणे
सगळं करून पाहिलय
आयुष्याच गणित मात्र
अपुर्णांकात राहिलय

नाणं

एकाच नाण्याला दोन बाजू असतात
हे जर तुला कळलं असत
माझ्यापासून दूर जाणारं पाऊल
अखेर माझ्याकडेच वळलं असत

18.1.07

निरोप

अधरावर थरथरत्या
बोल निरोपाचा ये
काठावर नयनांच्या
थेंब वियोगाचा ये
त्यावेळी जुळव नवे
काव्याचे धुंद थवे
उडवून दे त्यांनाही
कातरल्या संध्येला