23.2.07

वळण

तुझी आठवण आली
मी रडलोच नाही...
दिवसभर पाऊस पडला
मी भिजलोच नाही...

तासंतास म्हटल्या कविता
तुझा चेहरा मख्ख
तुला कविता आवडत नाहीत
मी समजलोच नाही...

आयुष्यभर हसवणूक केली
क्षणोक्षणी फसवणूक झाली
तुझ्या डोळ्यात आलं पाणी
मी फसलोच नाही...

जगणं म्हणजे झाला खेळ
भल्याबुऱ्याची नुस्ती भेळ
कणाकणाने क्षण गेले;
मी जगलोच नाही...

मुक्कामाला शोधत गेलो
ध्यास घेऊन चालत आलो
हवंहवंस वळण आलं
मी वळलोच नाही...

बाजार

मुर्खांच्या बाजारी
मुर्खांना मोल उरे
कचऱ्यासम रस्त्यावर
फेकुन देतात हिरे
मग आता का रुसणे?
का अन हे हिरमुसणे?
विसरून हे क्षुद्र खेळ

मौनातच रमवी मन !

दिवा

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या !

मी तुळस लावलेली, जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या !

मीही मठात गेलो; अन मंदिरात गेलो
मी चार धाम फिरलो, शांती मनात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!

ना तेल मी दिलेले, ना वातही दिव्याला
अंधार लख्ख अंती दिपला उरात माझ्या...!

7.2.07

प्रश्न

तसा मी कायमच शांत असतो.
मग तुझा प्रश्न कुठलाही असू दे...
एकाच प्रश्नांवर मी निरुत्तर असतो
उरलेल्या प्रश्नांवर मौन पाळतो...

कारण अगदी सोप्पं आहे...
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मी दिली
तर त्या प्रश्नाचं उत्तर...
तूच मला देशील ही भीती...

जखम

कोरा कागद दिसला
की काहीतरी खरडणं होतं
जुन्याच जखमांना मग
नव्याने भरडणं होतं

6.2.07

कळून आले

शब्दांचे बाण विषारी,
सुटल्यावर कळून आले
जगणे अवघड नव्हते,
मेल्यावर कळून आले

ज्यासोबत जगावयाची
मज सवय लागली होती
ते दुःखही माझे नव्हते
हसल्यावर कळून आले

उधळून टाकले ज्याला
मी फुलापरी तुजवरती
ते हृदय काच होते हे
तुटल्यावर कळून आले

कधी तुला रडू येईल का?
मज खरेच वाटत नव्हते
अंदाज चुकीचा नव्हता
गेल्यावर कळून आले

जगणे तर ओझे होते
मरणेही ओझे झाले
मी ओझे होतो नुसते
नेल्यावर कळून आले


तो डाव हातचा मीही
हसता हसता हरलो
जिंकणेच सोपे असते
हरल्यावर कळून आले

घोळ

चार पाच बगळे
येडे साले सगळे
चोच मात्र पाण्यात; लक्ष सगळं खाण्यात !

चार पाच मित्र
रोज चर्चासत्र
प्रश्न कळत नाहीत; उत्तरे मिळत नाहीत !

चार पाच कवी
वही सुद्धा नवी
दोनच कविता चोख; व्यवहार सगळा रोख !

चार पाच शब्द
त्यांच्यावर प्रारब्ध
चुकले जर का अर्थ; उभं आयुष्यच व्यर्थ !

दुःख

केवढे हे जीवघेणे दुःख असते
आसवे डोळ्यात अन ते मख्ख असते!
वाहतो मातीच माती दुःख वेडा
शेवटाची वात जैसी लख्ख असते!

5.2.07

भेट

कैक दिवस झालेत आता,
आपली भेट झाली नाहीये...
वर्षं लोटलीयेत कदाचीत...
काय गम्मत आहे ना!

बरेच दिवसांपासून मलाही,
स्वप्नं जाळायचा छंद जडलाय...