1.7.20

विठुराया

वेडी तुझी माया । देवा विठुराया ।
पडतो मी पाया । मायबापा ।।

मन सैरभैर । त्याला नसे ठाव ।
तूच रस्ता दाव । नारायणा  ।।

विनवितो तुला । देवा पांडुरंगा ।
मनातला दंगा । थांबवावा ।।

उजळून जावो । अंतर्बाह्य मन ।
सगुण निर्गुण । एक  होवो ।।

विचारांच्या पुढे । देवा तुझी गती ।
पामराची मती । गुंग झाली ।।


9.3.08

खुळी

उगाच कोणी सांगत बसते काहीबाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही

असाच माझा जरा वेंधळा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातामधला गुलदस्ता मज देऊ करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

अंतरातली उलथापालथ मी सावरते
स्पर्शाने अन खुळी तयाच्या मी बावरते
तो चुंबून जातो नकळत माझ्या हातालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...
............
अन मी रुसून जाता तोही निघून जातो
ओंजळ भरली फुले उशाशी ठेवून देतो
मग मी विसरून जाते सगळे यावेळीही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

मी होता उदास म्हणतो चुकलो आणि
डोळ्यांमध्ये तरारलेले दिसते पाणी
मी विरघळते जैसी साखर दुधामध्ये ही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

4.3.08

खेळ

ती फुलं माळताना जरा काळजी घे
उमलणं हा त्यांना शाप वाटायला नको!

माझ्याशी बोलताना थोडी काळजी घे
जीव लावणं हा मला खेळ वाटायला नको!

कोमेजणं हे दोघांचही अटळ प्राक्तन आहे
फक्त वेळ चुकली असं वाटायला नको!

22.2.08

ऋतू

ऋतू येत होते ऋतू जात होते !
बहरणे फुलांच्या न भाग्यात होते !

इथे तेच जाणून होते यशाला ;
दिमाखात जे जे शिव्या खात होते !

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !

तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या
इथे पावसाळे उन्हाळ्यात होते !

कसे बोचते सूख आताच त्यांना?
कधी ते सुखाने व्यथा गात होते !

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो…
हसे चांदणीचे लिलावात होते…!

नको एवढा जीव लावू कुणाला
युगांचे दिवाळे क्षणार्धात होते !